मैत्रीण
ती माझी जीवाभावाची सखी. कॉलेजमधली मैत्रीण. साधी-भोळी, निर्मळ मनाची , हसरी . सर्व ‘मुलींच्या गोष्टींमध्ये’ तिला भारी रस. मेन्दी काढणे, चेहेर्याची शोभा वाढवण्यासाठी कसले कसले लेप लावणे , नवीन नवीन केशभूषा करणे ह्या सगळ्यात ती पटाईत . लिंकिंग रोडला जाऊन नव्या नव्या फॅशनचे कपडे घासाघिस करून स्वस्तात मिळवणे हा तिच्या डाव्या हातचा मळ. भाबड्या स्वभावामुळे तिला विनोद जरा उशीराच समजत, त्यामुळे ग्रुपमध्ये तिची ताणायला मजा यायची. पण तीसुद्धा ते एंजॉय करायची, अजिबात न रागावता.
माझ्या ताईच्या लग्नात ताईचा मेकप बरा नाही जमला. तो तिने छान दुरुस्त केला. तेव्हापासून तिचीमाझी फारच गट्टी जमली. मग वेगळा विषय घेण्यासाठी तिने कॉलेज बदललं, पण आमची मैत्री कायम राहीली. तिची मम्मा, डॅडी, तिची आऊ, तिची धाकटी बहीण , सगळ्यांना माझ्या तिच्याकडे होणार्या फेर्याची, वेळीअवेळी होणार्या फोनकॉलची सवयच होऊन गेली. माझ्या घरीही तिची सवय झाली.
आगाऊपणा आमच्या अंगात वयानुरूप होताच. एका मैत्रीणीला दगा देणार्या तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी फोन करून आम्ही दोघींनी त्याच्या आईवडीलांकडे त्याची चुगलीही केली होती. (आता आठवलं तरी लाज वाटते.) तेव्हां आपण फारंच महान काम केलंय अशी आमची खात्री होती.
कॉलेजच्या फनफेअरमध्ये भेळपुरीचा स्टॉल लावण्याचं धाडसही आमच्या ग्रुपने केलं होतं. तिच्या घरी चटण्यांना चव आणण्या्चा निष्फळ प्रयत्न करून ,तिच्या मि्क्सरची वाट लावून, कीचनमधला पसारा तिच्या आऊला आवरायला ठेऊन आम्ही कॉलेजला स्टॉल लावायला धावलो होतो.शेवटी कशीबशी ती भेळपूरी एकदाची विकून संपवली होती . माझा तो पाककलेचा पहीलाच प्रयत्न होता, पण तिचाही तो पहिलाच होता हा मला शोध लागला होता.
जेमतेम पदवी पदरात पडता- पडता बाइसाहेबांना मागणी आली. घरासमोरच राहणारा जावई मिळाला म्हणून तिच्या आई-वडीलांचा आनंद गगनात मावेना. हुशार, देखणा, कर्त्रुत्ववान , उत्तम करीयर , घरी फक्त सासू , एक विवाहीत नणंद, सगळंच कसं हवं तसं.
ती फारशी खूश नव्हती. तिला काहीतरी करायचं होतं, नोकरी, किंवा ब्युटिपार्लर, किंवा कसलातरी कोर्स. पण डोळ्यापुढे ठोस ध्येय नसलेल्या तरूण मुलींच जे होतं तेच तिचं झालं……. लग्न. त्या मागणी घालणार्याशीच.
तिचा साखरपुडा झाला तेव्हा माझं एमेस्सी चालू होतं . तिचा साखरपुड्याचा मेकप माझ्या देखरेखीखाली झाला(!!!!!). माझा नटायचा फारच उल्हास. त्यामुळे मला अगदी परीकथेतला प्रसंग बघावा तसा तो मेकप लक्षात आहे. फारच सुंदर दिसली ती त्या दिवशी. तिच्या घनदाट केसांचा पिसारा फुलवून त्याची केलेली सुंदर केशरचना , त्यावर लावलेली चकमक , तिच्या नाजूक धारदार नाकावरची लखलखणारी चमकी , तिच्या सावळ्या चेहेर्याला खुलून दिसेल असा हलकासा मेकप .फारच सुंदर दिसली ती त्या दिवशी. आकाशी रंगाची साडी, टिकल्या आणि मणी लावलेली, त्याच्या आवडीची, आणि तिच्या नावडीची, त्याने त्याच्याच आवडीची जबरदस्तीने घ्यायला लावली म्हणून .
आणि मग हलक्या कुरबूरी कानावर येतंच राहील्या. कारण तिला नो चॉइस नो वॉइस. तो फारच हुशार, महत्वाकांक्षी , करियरमध्ये भरभर वर गेला. त्याचं विश्व बदलत गेलं, क्षितिज रुन्दावत राहीलं. वर्तुळ बदलत गेलं. ती मात्र तशीच राहीली; साधीभोळी, सरळ, देखावा नाही, शो बिझनेस नाही . त्याच्या गतीशी जुळवणं तिला जड जायला लागलं आणि तिच्या सरळ , साध्या अपेक्षा त्याला आवडेनाश्या झाल्या . परीणामी कधीही तिला फोन केला तरी एकच पालुपद , ‘ आज आमचं चांगलंच वाजलं.’ मला ह्याचा ईतका कंटाळा यायला लागला की मी तिचा फोन कधी कधी टाळायला लागले.
वर्षामागून वर्षं जात राहीली. तिला एक गोड छोटूली झाली . सर्वच विसंवादी ( म्हणजे जवळ जवळ सगळ्याच ) जोडप्यांमधे मुलांना वाढवण्यावरून होतात तसे वाद त्यांच्यात होत राहीले. ती अधिकाधिक असमाधानी राहीली. तो अधूनमधून वाहावत राहीला . पण आता हळूहळू त्यांच्या संसाराची गाडी योग्य रुळावरून धावायला लागली असं वाटलं.
ती मध्ये मध्ये संकल्प सोडायची — काहीतरी करण्याचा, आर्थिक द्रुष्ट्या स्वतंत्र होण्याचा , स्वतःची आयडेंटीटी बनवण्याचा . पण तो प्रत्यक्षात कधी आला नाही.
अशातच अचानक एक दिवस त्याला तो जीवघेणा आजार झाल्याचं लक्षात आलं. ती हादरून गेली. दोन वर्ष अथक उपचार. तो फार खंबीरपणे उभा राहीला. ती सावलीसारखी त्याच्यापाठीशी उभी होती.
दोन अडीच वर्षांची त्यांची म्रुत्यूशी झुंज , नुकतीच संपली . तो सुटला , हालअपेष्टांतून . ती राहीली मागे . एका अर्धवट वयाच्या मुलीला मोठं करायला , तिला आई – वडील , दोघांची माया द्यायला , आजारी सासूची काळजी घ्यायला.
माझी साधीभोळी मैत्रीण , त्याने तिला कधी काही कमी पडू दिलं नाही , पण ईथून पुढे काय ? चाळीशीच्या उम्बरठ्यावर असूनही जगाचा विशेष वारा न लागलेली ती आता काय करेल ? ईश्वरा , तिला बळ दे , रस्ता दाखव ,
आणि मला बळ दे ; तिला भेटण्याचं , सांत्वन करण्याचं .
सप्टेंबर 12, 2007 at 11:52 सकाळी
माणसाला जेव्हा कोणाच्या तरी आधाराची गरज असते तेव्हा आपण जर त्यांना आधार नाही देउ शकलो तर आपल्याला मॆत्रिण म्हणवून घेण्याचा किती हक्क आहे? मला या मॆत्रिणीची दया येते. माणसाला सुखात कोणाचीच आठवण येत नाही पण दुखात मात्र नक्की येते अशावेळी आपण मदत करायला पाहीजे.